Published On Apr 21, 2023
हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेचे खास महत्व
अक्षय्य शब्दाचा अर्थ आहे ‘कधीही नाश होत नाही असा’. या दिवशी केलेला जप, दान, ज्ञान हे अक्षय्य फळप्राप्ती देणारे असते. म्हणून याला अक्षय्य तृतीया असे म्हणतात. भविष्यपुराण, मत्स्य पुराण, पद्मपुराण, विष्णुधर्मोत्तर पुराण, स्कंदपुराणात याचा विषेश उल्लेख केलेला आढळतो. या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे श्रेष्ठ फळ मिळते. या दिवशी देवांचे व पितरांचे पूजन केले जाते.
वैशाख महिना हा भगवान विष्णु साठी आवडता आहे. म्हणून विशेषतः विष्णू व देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते. वैशाख महिन्यातील तृतीयेला चंदन मिश्रित पाणी व मोदकाच्या दानाने ब्रम्ह तसेच सगळे देवता प्रसन्न होतात. या दिवशी अन्न, वस्त्र, सोने आणि पाण्याचे दान केल्याने अक्षय फळाची प्राप्ती होते आणि दान देणाऱ्याला सूर्यलोकाची प्राप्ती होते. या दिवशी जो उपास करतो तो सुख-समृद्धीने संपन्न होतो.
या दिवशी पाण्याचे मडके, पंखे, पादत्राणे(चप्पल-बूट), छत्री, जवस, गहु, तांदूळ, वस्त्र यांचे दान करणे पुण्यदायी असते. परंतु दान हे सत्पात्री असावे.
पवित्र जलाने स्नान करून, श्री विष्णू आणि लक्ष्मीची पूजा, जप, होम, दान आणि पितृतर्पण करावे. या दिवशी अपिंडक श्राद्ध करावे आणि शक्य नसेल तर निदान तीलतर्पण तरी करावे. या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून ब्राम्हणाला उदक कुंभाचे दान करावे, असाही एक समज आहे.
या तिथीला नरनारायण, परशुराम आणि हयग्रिव यांचा जन्म झाला म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो.
अक्षय तृतीयेला वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करणं शुभ मानलं जातं. याने घरात समृद्धी आणि भरभराटी येते असा समज आहे. या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे, नवीन वस्त्र, दागिने विकत घेणे, नवीन वाहन खरेदी करणे अशा गोष्टी केल्या जातात.
* या वर्षी
अक्षय तृतीया* २२ एप्रिल ला साजरी केली जाणार आहे.
पुजेसाठी शुभ मुहूर्त: सकाळी ७.४९ मी. ते दुपारी १२.२० पर्यंत
*तृतीया तिथी *: सकाळी ७.४९ पासून
सायंकाळी ७.४७ पर्यंत आहे.