Published On May 31, 2021
अकोला : इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असं म्हटलं जातं. त्याबरोबरच कालचक्र पूर्ण होत असल्याचंही आपण ऐकत आलो आहे. परवा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या भेटीनंतर त्यावर परत नव्याने शिक्कामोर्तब झालं आहे. 'सामाजिक एकात्मता' आणि 'अस्पृश्यता निवारणा'च्या कामात छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खांद्याला खांदा लावत सोबत काम केल्याचा इतिहास साक्षी आहे. आता परत शाहू-आंबेडकरांचे वारसदार एका राजकीय विचारांच्या दृष्टीने नव्याने परत एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. परवा, 29 मे रोजी खासदार छत्रपती संभाजीराजेंनी प्रकाश आंबेडकरांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. या दोघांच्या या राजकीय भेटीने राज्याच्या राजकारणात चांगलाच राजकीय धुरळा उडाला आहे.