Published On Sep 13, 2019
ढोल–ताशा पथक म्हटले की, सगळ्यांना आठवतो तो पुण्याचा गणेशोत्सव. पण हल्ली हे समीकरण केवळ पुण्यापुरतं मर्यादित न राहता, हे ढोल-ताशाचे लोण हळूहळू सर्व महाराष्ट्रात पसरु लागलंय, फोफावू लागलंय. आणि का फोफावू नये ? महाराष्ट्रातील मातीतील, शिवरायांच्या इतिहासाशी नाळ जोडणारं, महाराष्ट्राच्या संस्कृतीत वाढलेलं एक वाद्य महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या भारतात वाजू लागलं, तर त्या बिघडलं कुठं ?
ढोल-ताशा ही दोन्ही वाद्ये महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा जपणारी वाद्यं आहेत. ही वाद्ये शिवरायांच्या स्वराज्यात विजयी मिरवणुका व सणवारांना मावळ्यांकडून वाजवली जात असतं. म्हणून काही ठिकाणी यांना मावळ ढोल-ताशे असं म्हटलं जात असावं. रणांगणामध्ये वीरांना लढण्यासाठी स्फूर्ती देण्यासाठी रणंवाद्यं म्हणून देखील ही वाद्ये वाजवली जात असल्याबाबतच्या नोंदी इतिहासाची पान चाळल्यावर आढळून येतात.
महाराष्ट्रात ढोल-ताशांची परंपरा जिवंत ठेवण्यामध्ये पुणे शहरातील ढोल-ताशा पथकांचा मोलाचा वाटा आहे. आज महाराष्ट्राला याच पथकांमुळे ढोल-ताशाची भुरळ पाडली आहे, असं म्हटलं तर वावग ठरु नये.